कोरोना लढ्यासाठी जामखेडच्या सर्वच प्रशासनाने ‘कसली कंबर’
जामखेड : हॉटस्पॉट म्हणुन घोषित केलेल्या जामखेडसाठी आमदार रोहित पवार यांनी आगोदरपासुनच आखणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,प्रांताधिकारी अर्चना नष्टे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर,जिल्हा आरोग्याधिकारी संदीप सांगळे,पोलिस उपअधीक्षक संजय सावंत यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची जामखेड येथे नियोजन बैठक पार पडली.या अगोदरही आ.पवार यांनी याबाबत बैठका घेतल्या आहेत.तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्या
नेतृत्वाखाली हॉटस्पॉट असलेल्या जामखेडसाठी आता खबरदारीच्या उपाययोजनांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या सुमारे २१ वॉर्डामध्ये तहसीलदार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक वार्डाची जबाबदारी प्रशासनाचे कर्मचारी मुख्याधीकारी म्हणुन काम करतील.त्यांच्यासोबत दोन शिक्षकही असतील असे ऐकून चार कर्मचारी एका वॉर्डची जबाबदारी घेतील.आता नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर प्रशासनाचा वॉच राहणार आहे.
ग्रामस्थांसाठी नियंत्रणकक्ष कार्यरत असुन त्यांच्या मागणीच्या नोंदी घेऊन त्याप्रमाणे त्यांना जीवनावश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी व कोरोना विरोधात लढण्यासाठी तालुक्यातील सर्वच प्रशासनाने कंबर कसली आहे. कोरोनाला ब्रेक देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न सुरू आहेत. जामखेड शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत या पार्श्वभूमीवर कोरोना प्रसाराची साखळी तोडून फैलाव रोखण्यासाठी राज्यभरातील विचार करता सर्वात जास्त चाचण्या येथे घेण्यात येत आहेत.
जे संशयीत घाबरत होते,नाव सांगत नव्हते अशा लोकांचा प्रशासनाच्या मदतीने शोध घेऊन त्यांचीही चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.जे कोरोना बाधित आहेत अशा लोकांच्या संपर्कात जे आले आहेत अशा लोकांच्या देखील चाचण्या करण्यात आल्या आहेत.कोरोनाबाबत दक्षता घेत असताना
कर्जत-जामखेडच्या सर्वच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी अशा कोरोना वॉरीअर्सना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन सर्वाधिक मास्क,सनीटायझर,मास्क लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असुन मतदारसंघातील प्रत्येक गावात निर्जन्तुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.असे असले तरी कोरोनाचा एकही रुग्ण आढळू नये तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्यविभाग,पोलिस यंत्रणा तसेच सर्वच प्रशासकीय अधिकारी जीव ओतून आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
कर्जत-जामखेडला वेगळ्या पटर्नची गरज नाही!
प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाचा इतर भागात फैलाव झाला नाही.चाचण्या,शोधमोहीम,सुरक्षितता हे सर्व प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.रुग्णांची संख्या वाढली असली तरी जेवढे आपण मुळाशी जाऊ तेवढा इतरांना धोका होणार नाही.आपल्याला प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही त्या ठिकाणी पहिल्यापासुनच योग्य नियोजन सुरू आहे- रोहित पवार