पुणे -“प्लॅस्टिक’ म्हणजे विज्ञान आणि संशोधनाचा एक अविष्कार मानला जात असे. हळूहळू आपल्या सर्वांच्या आयुष्यात या किरकोळ वाटणाऱ्या “प्लॅस्टिक’ने शिरकाव केला. आज आपण या “प्लॅस्टिक’वर अवलंबून आहोत. सभोवतालच्या बहुतांश गोष्टी, वस्तू “प्लॅस्टिक’पासून तयार झालेल्या दिसून येतात. या “प्लॅस्टिक’चे भयंकर दुष्परिणाम आपल्याला आणि पुढील कित्येक पिढ्यांना भोगावेच लागणार आहेत. कारण प्लॅस्टिक तयार झाले, पण ते नष्ट कसे करायचे? याचे ठोस उत्तर विज्ञानदेखील आजपर्यंत शोधू शकलेले नाही. यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पनादेखील “डेर्श्रीींळेपी ीें झश्ररीींळल झेश्रर्श्रीींळेप’ म्हणजेच “प्लॅस्टिक’मुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाय शोधणे अशी आहे. या “प्लॅस्टिक’पासून निर्माण झालेली पाण्याची बाटली, ही साधी वस्तू. पण, ती नष्ट करता येत नसल्याने जीवघेणी झाली आहे. हे टाळण्यासाठी आपण सर्वजण “आजपासून प्लॅस्टिकपासून तयार झालेली पाण्याची बाटली वापरणार नाही’ असा संकल्प करूया…
त्यामुळे “प्लॅस्टिक नकोच’…
आपल्या घर-ऑफिसमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वाटा असतो. ज्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. डिस्पोजेबल सिंगल-यूज प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या जमिनीत बुजवल्यानंतरही नष्ट होत नाहीत. तर, त्या तेथील जैविक आणि अजैविक परिसंस्थेवर परिणाम करतात. यातून मानवासह अन्य सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात. त्यामुळे “प्लॅस्टिक नकोच’ अशी दिनचर्या आपण नक्कीच निवडू शकतो. एका संशोधनानुसार, प्रत्यक्षात फक्त 9 टक्के प्लॅस्टिक बाटल्यांचा फेरवापर होतो. बाकीचे लोक या बाटल्या फेकून देतात किंवा त्या जमिनीत बुजवण्याचा मार्ग शोधतात. प्लॅस्टिक बाटल्यांचे “मायक्रोप्लॅस्टिक’मध्ये रुपांतरित होण्यास 450 वर्षे लागतात. त्यामुळे प्लॅस्टिक वापराचा धोका आपण समजून घ्यावा लागेल.
जुन्या प्लॅस्टिक बॉटल्यांचे मी काय करू शकतो?
आपल्या घरात नावीन्यपूर्ण आणि सुंदर फुलांची भांडी म्हणून आपण प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा फेरवापर आपण करू शकतो. घरात, बागेत किंवा टेरेसवर अशा बाटल्यांमध्ये शोभेची छोटी झाडे आपण लावू शकतो. सोबतच पेन बॉक्स, कॅरिबॅक जमा करण्यासाठी किंवा साठवणुकीचे कोरडे पदार्थ आपण अशा जुन्या बाटल्यांत जमा करू शकतो. त्याला छानसा रंग देऊन, कलाकुसर करून आपण त्यांचा उपयोग करू शकतो. काही ठिकाणी स्वयंसेवा संस्था प्लॅस्टिक संकलन उपक्रम राबवतात. त्यातून बाटल्यांचे री-सायकलिंग केले जाते. त्यांच्याकडेही आपण अशा बाटल्या देऊ शकतो.
प्लॅस्टिक बाटल्यांना पर्याय काय?
प्लॅस्टिक हे जैवविघटनशील किंवा फेरवापर करण्यायोग्य नाही. त्यामुळे दररोज फेकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा आपल्या पर्यावरणाला धोका आहे. विषारी परिणाम आणि रासायनिक दूषिततेमुळे प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवून ते पिण्यामुळे देखील आरोग्य धोक्यात येते. आपण प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर टाळला पाहिजे आणि इतर पर्यायांकडे वळले पाहिजे. उदा. स्टील, माती, काच, बांबू यांपासून तयार करण्यात येणाऱ्या बाटल्या आपण वापरू शकतो. ज्या सहसा फेकल्या जात नाहीत.
प्लॅस्टिक बाटली का नको?
एकदाच वापरल्या जाणाऱ्या, डिस्पोजेबल प्लॅस्टिक बाटल्यांमुळे पिण्याचे पाणी रासायनिक दूषित आणि विषारी हाते. सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या संपर्कात आल्याने प्लॅस्टिक गरम होते आणि त्यातून विषारी रसायने पाण्यात मिसळतात. मोकळ्या जागेत पाण्याच्या बाटल्या ठेवल्याने त्या गरम होतात आणि पाणी पिण्यासाठी असुरक्षित होते. याबाबत अनेक संशोधने जगभर झाली आहेत.
ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच..
जगातील सर्वांत मोठा असलेल्या पॅसिफिक महासागरात तब्बल 1.5 दशलक्ष चौरस किलोमीटरवर कचरा साचला आहे. हा भाग आता एखाद्या बेटासारखा झाला आहे. एका अंदाजानुसार, येथे सुमारे 1.8 ट्रिलियन इतके प्लॅस्टिकचे तुकडे साठले आहेत. हा ढिगारा इतका मोठा आहे, की त्याला “ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ म्हटले जाऊ लागले. यात प्रामुख्याने मासेमारीची जाळी, अपघातग्रस्त बोटी, प्लॅस्टिकच्या बाटल्या, दोरी अशा अनेक गोष्टी समुद्रात जमा होत आहेत. प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन लवकर होत नसल्याने तो कचरा दिवसेंदिवस साचत असून, तो दूरपर्यंत पसरला आहे. त्यावर सागरी वनस्पतीही गुंडाळल्या जात असून, अनेक जलचर यात अडकून जीव गमावत आहेत आणि हे प्रमाण आता धोक्याच्या पुढे गेले आहे.