भाजप नेत्यांचा नगरसेवकांना धीर देण्याचा प्रयत्न
पुणे – राज्यात सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पुढील दोन वर्षांत महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे त्यासाठी शासनाकडून दोन नगरसेवकांचा प्रभाग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवकांनी घाबरू जाऊ नये, तसेच जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळून काम करावे अशा सूचना नगरसेवकांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षपदाचे उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलात बैठक घेतली. यावेळी नगरसेवकांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत सूचना केल्या.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांची सत्तासमिकरणे बदलली आहेत. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपकडून मोठ्या महापालिकांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी 2 ऐवजी 4 चा प्रभाग करून पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका आणल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला असून तब्बल 99 नगरसेवक आहेत. मात्र, आता पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालिका निवडणुकांमध्ये 2 च्या प्रभागांची रचना निश्चित मानली जात आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये उलट-सुलट चर्चा आहेत.
तर महापौर आणि स्थायी समिती तसेच सभागृहनेते पदासाठी तयारी करणारे अनेकजण नाराजही आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी या बैठकीत नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिका निवडणुकीत केवळ आपल्यामुळे पक्षाचे 26 वरून 98 नगरसेवक झाले असल्याचे सांगत, एका प्रमुख पदाधिकाऱ्याने सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या निवडीबाबत अप्रत्यक्ष शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, या पदाधिकाऱ्यांनी चेहरे पाहून नगरसेकांची कामे करून नयेत असे प्रकार आता बंद करावेत अशी तंबीही दिली. त्यामुळे बैठकीतही पक्षातील नाराजी अप्रत्यक्ष समोर आली.
पदाधिकाऱ्यांचा सूर नरमला
विधानसभा निवडणुकांनंतर पक्षाला शहरातील 8 मधील 2 जागा गमवाव्या लागल्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील तसेच शहर पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या प्रत्येक बैठकीत नगरसेवकांना धारेवर धरले जात होते. मात्र, या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर नरमला असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. नगरसेवकांना धारेवर धरल्यास त्याचा फटका पालिका निवडणुकीत बसेल तसेच पक्ष फुटण्याच्या भीतीने हा सूर बदलाला असल्याची मिश्किल टिप्पणीही काही नगरसेवकांनी केली.