मुंबई – देशात मागील एक वर्षांपासून केंद्र सरकारने पारित केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. त्यांच्या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेनेने आता ”व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’” असे म्हणत पंतप्रधान मोदींसहीत भाजपालाही या मुद्द्यावरुन चिमटा काढला आहे. तर संजय राऊत यांनी ट्विट करून टोला लगावला.
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांनी खोचक टीका केली. खासदार राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘बैल कितीही आडमुठा असेना, शेतकरी आपलं शेत नांगरून घेतोच. जय जवान, जय किसान’. राऊत यांचा रोख थेट मोदींकडेच होता.
याआधी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील मोदींसह भाजपवर टीका करण्यात आली होती. ५५० शेतकऱ्यांनी बलिदान दिले, दीड वर्ष ऊन-वारा-थंडी-पावसात ते रस्त्यावर लढत राहिले. हे शेतकरी मागे हटणार नाहीत व उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतल्याचं सामनाच्या आग्रलेखात म्हटलं होतं.