पुणे : महाराष्ट्रात करोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. मात्र लॉकडाऊननंतर राज्यातील करोना स्थिती काही प्रमाणात आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यमान महाविकास आघाडी सरकारने अथक परिश्रम केले. ज्याच कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केले. यात राज्य सरकारला विरोधी पक्षातील नेत्यांनीही मदत केली. मात्र विरोधी पक्षातील नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण इतर सर्व नेत्यांच्या तुलनेत करोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक काम केल्याचा दावा केला आहे.
करोनाच्या संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. आम्ही करोनाच्या काळात सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताच नेता फिरला नसेल, असाही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पाटील यांनी लस खरेदीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारने परदेशी लसींना अद्याप परवानगी न दिल्याने महाराष्ट्र सरकारची लस खरेदी रखडल्याचे अजित पवार म्हणतात. पण मग लसींना परवानगी नसताना त्यांनी ग्लोबल टेंडर हा शब्द उच्चारलाच कसा ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
मुंबई महानगरपालिकेप्रमाणे पुणे पालिकेला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून लस खरेदीसाठी परवानगी दिली जात नसल्याच्या भाजप नेत्यांच्या आरोपात तथ्य असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी भाजप काही लोकांना फूस देत असल्याचे आरोपही पाटील यांनी फेटाळून लावले. यासंदर्भात सचिन सावंत यांनी प्रथम पुरावे सादर करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.