मुंबई – राज्यामधील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व पोलिस अधिकारी आपापल्या परीने काळजी घेत आहेत. भविष्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस दल प्रयत्न करत आहे. जनतेने देखील त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील आढावा बैठक आज संपन्न झाली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले, मशिदींवरील भोंग्यासंदर्भात भाजपने कर्नाटकात आंदोलन सुरु केले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील त्यांनी हा विषय काढला आहे. हिंदू मतांचे विभाजन करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण केली जाते. राज्याची पोलिस यंत्रणा सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा ठाम विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांच्यावर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी भाष्य केले. कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा चौकशी न करता ईडीकडून अशाप्रकारची कारवाई होत असेल, तर केंद्र सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे, हे आपल्या लक्षात येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच कितीही कारवाई झाली तरी सरकारला कोणताही धोका नाही, सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करेल, असेही गृहमंत्री म्हणाले.