सातारा -जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सध्या तरी लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा विचार नसून याबाबत अफवाच असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होऊन मृतांचा आकडाही वाढला. जिल्ह्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली. सातारा शहर आणि परिसरातही रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सातारा शहरातील दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण असताना गुरुवारपासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा होती. गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये शहरात आणखी पाच बाधित वाढल्याने शुक्रवारी सकाळपासून लॉकडाऊनची चर्चा चांगलीच रंगली होती.
जिल्ह्यात लॉकडाऊनची अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्याच्या पार्श्वभूमीवर शेखर सिंह म्हणाले, जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, लॉकडाऊनचा सध्या तरी विचार नाही. प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनांचे व्यावसायिकांनी
काटेकोरपणे पालन करावे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन परिश्रम घेत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांनी घरातून बाहेर पडणे टाळावे. व्याधीग्रस्त असलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घरातून बाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी जाताना सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा.
करोना संसर्गाने फैलावत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे. जिल्ह्यात लॉकडाऊनचा विचार नाही. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी दक्षता घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले.