मुंबई : राज्यामध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना प्रयत्न करत आहे. तसेच हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नदेखील करत आहे. अशामध्ये ‘राज्यामध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही’, असा दावा भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सोलापूर येथे आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते.
सुभाष देशमुख यांनी सांगितले की, ‘भाजप आणि शिवसेनेला हिंदुत्वाच्या आधारावर जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम आहे. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करताना भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असा आग्रह धरला आहे. मात्र शिवसेनेने जास्त मागण्या केल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेला विलंब झाला.’ तसंच, जोपर्यंत शिवसेना- भाजप एकत्र येत नाही तोपर्यंत युतीतील तिढा सुटणार नाही. महायुतीने सत्तास्थापन न करुन जनतेची निराशा केली असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. बुधवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर गुरुवारी पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रादी कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.