मुंबई -राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे.
असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे अजित पवार म्हणाले की, मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 265 कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आला आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या कामासंबंधी निधी दिला होता, तोही थांबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्यासाठी काही कामे हातात घेतली होती, त्यांचे शौर्य लोकांना कळावे अशी त्यामागची भावना होती. या कामांचा निधी थांबविण्याचे काहीच कारण नव्हते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नव्हते. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितली असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी संदर्भातील कामाला स्थगिती नाही. मी स्वतः फाईलवर असे लिहिले आहे की, या कामाला स्थगिती नाही. मात्र पुन्हा सादरीकरण करावे आणि जी कामे अजून शिल्लक असतील, ती सुद्धा समाविष्ट करावी !
देवेंद्र फडणवीस, (उपमुख्यमंत्री)