नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने सहा महिन्यांसाठी कर्जाचा हप्ता न देण्याची सवलत दिली आहे. या सवलतीला मुदतवाढ धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना राजन म्हणाले की, लोकांना एकदा हप्ता भरण्याची गरज नाही, असे सांगितले की त्यांना पैसे न देण्याची सवय होते. नंतर त्यांना पुन्हा शिस्त लावण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. आंध्र प्रदेशामध्ये मायक्रोफायनान्स क्षेत्रात असा प्रयोग केला गेला होता. मात्र तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली होती, याची आठवण राजन यांनी करून दिली.
लॉकडाऊनमुळे ग्राहकांचे वर्तन बदलले आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा देऊन राजन म्हणाले की, सरकारने करोनाला रोखण्याचा जास्त प्रयत्न करावा. लस येण्याची वाट पाहू नये. भारतातील बॅंका समोर कर्जवसुलीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जवसुलीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण कर्ज जितके जुने होते तितके ते वसूल करण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र, भारतीय बॅंकांमध्ये वसूल न झालेले कर्ज लपविण्याचा प्रकार बराच काळ घडला होता. त्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली आहे.
वेगात योग्य उपाययोजना केल्यास भारत सध्याच्या परिस्थितीतून अधिक बळकट होऊन बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले. कारण, भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. मात्र, या तरुणांना आधुनिक कौशल्य देण्याची गरज आहे.
महागाई रोखावी
रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या कामगिरीची स्तुती केली. बॅंकेने वेळीच काही उपाययोजना जाहीर केल्या. राष्ट्रीय उत्पन्न कमी होणार आहे, त्याचबरोबर रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होण्याची शक्यता होती. मात्र, या काळात बॅंकेने प्रयत्न करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यात यश मिळविले आहे. आता बॅंकेने वाढणाऱ्या महागाईला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राजन यांनी सांगितले.