मुंबई : मागील काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नावाची चर्चा जोरदारपणे होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या वक्तव्यांनी देशभरात गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल ही महाराष्ट्रापासूनच घेण्यात आली आहे. त्यांनी राज्यात येऊन इथल्या संतांचा अपमान केला होता. त्याच्या याच कृतीचा परिणाम म्हणून यापुढे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आता राज्यात प्रवेश नसणार आहे. यासाठी विरोधकांनी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे की, “बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका.” शास्त्री यांचा कार्यक्रम १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
पटोले यांनी लिहिलेल्या पत्रात, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्य” लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात कार्यक्रम घेण्यास परवानगी देणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये.” अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता पटोले म्हणाले की, “बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकार स्वतःच अशा लोकांना पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही.” असे म्हटले आहे.