कोलकाता – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात ही राज्य देशातील कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरत असून येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या तुलनेने कमी आहे तेथे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न होताना दिसतायेत.
याच पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असलेल्या शहरांतून कोलकात्यात होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात यावीत अशी मागणी केली होती. सरकारच्या या मागणीला आज यश आलं असून कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालकांनी दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांमधून होणारी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.
ही उड्डाणे 6 ते 19 जुलै 2020 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. जर नागरी उड्डाण मंत्रालयाने या शहरांमधून उड्डाणे सुरु करण्याबाबतचे आदेश दिले तर ही उड्डाणे १९ जुलैपूर्वी सुरु होतील असं देखील कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालकांनी सांगितलं आहे.