मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषद व 4 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे.
महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. ही लढाई अंतिम टप्प्यात असताना निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये अशी आमची विनंती आहे,असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.