मुंबई – काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने आहे आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेसची भुमिका आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीतच आरक्षण टिकावे यावर चर्चा होऊन 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण ठेऊन निवडणुका घ्याव्यात आणि त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. या अध्यादेशाला आगामी अधिवेशनात कायद्याचे स्वरुप द्यावे असा निर्णय झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अध्यदेशाला स्थगिती दिली आहे. यावरील पुढील सुनावणी 13 तारखेला होत असून त्यावेळी राज्य सरकार आपली भूमिका मांडेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल, असे आम्हाला वाटते.
पुढे पटोले म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा गुंता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच वाढला आहे. भाजपाची याबद्दलची दुट्टपी भूमिका आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्यासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे भाजपा ओबीसी (OBC) आरक्षणासाठी लढत आहे असे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे,असेही ते म्हणाले.
भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे. आरएसएसची आरक्षणाबद्दलची भूमिका आधी भाजपाने स्पष्ट करावी व मग आंदोलनाबदद्ल त्यांनी बोलावे. त्यांचा छुपा अजेंडा सर्वांना माहित आहे, असा आरोपही पटोले यांनी लागवला.