मुंबई – राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.
जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत निवडणुक घेऊ नये अशी सर्व पक्षांची भूमिका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावर आयोजित बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर नाना पटोले आदी उपस्थित होते.
आज पार पडलेल्या बैठकीत इम्पेरिकल डेटा तयार करून घेण्यावर एकमत झालं. मात्र जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, यावर सर्व पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याचं फडणवीस म्हणाले.