सणबूर (वार्ताहर) – पाटण तालुक्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहरातून सुमारे 74 हजार लोक परत आले आहेत. तालुक्यात करोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आमदार व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे गत दोन महिन्यांपासून रोज रस्त्यावर उतरुन नियोजन करीत आहेत. करोनाच्या संदर्भातील या सर्व कार्यबाहुल्यामुळे त्यांना सलग दोन महिने मुंबईला जाता आले नाही. मंत्री म्हणून मंत्रालयात जाता आले नसलेतरी ते त्यांच्या होमपिच असणाऱ्या सातारा जिल्ह्यातून गृहविभागाचा ग्रामीण भागाचा कारभार पहात आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ना. देसाई यांच्यावर गृहराज्यमंत्री म्हणून राज्याच्या ग्रामीण भागाची तसेच वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी लिलया उचलली असून जनतेसाठी त्यांचे अहोरात्र काम सुरु आहे. अतिशय संवेदनशील असणारा राज्याचा गृहविभाग तितक्याच संवेदनशील पणाने सांभाळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
सर्व जिल्हयातील जिल्हा पोलिस अधिक्षकांशी फोनद्वारे व ब्रीफींगने त्यांचा दिनक्रम सुरु होतो. पाटण तालुक्यात ढेबेवाडी, कुंभारगांव विभागातील सहा गावामध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडल्याने या गावांना भेटी तसेच गावांच्या पहाणी करण्याचा आणि येथील आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचा त्यांचा पूर्वनियोजीत दौरा होता.
दौऱ्यावर जाण्यापूर्वीच त्यांच्या कानावर नांदेड जिल्ह्यात शिवाचार्य महाराज यांचा खून झाल्याची घटना घडली असल्याचे कानावर आले. त्यांनी तात्काळ नांदेडचे जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.
जनतेमध्ये उद्रेक होण्यापूर्वी या खुन्याचा तपास लावावा अशा सूचना केल्या. पाटण विभागातील गावांच्या भेटीचा दौरा संपण्यापूर्वीच नांदेड पोलीस अधिक्षकांचा ना. देसाई यांना शिवाचार्य महाराज यांच्या खुन्याचा तपास लागला असून त्यास ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली. अशाप्रकारे प्रशासनातील अभ्यास असणारा गृहराज्यमंत्री त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे.