पिंपरी : कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२२ मार्च) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्याला पिंपरी-चिंचवडकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. काल शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद होत्या.
शहरात काल दिवस-रात्र जनता कर्फ्यू होता. सर्व पोलीस यंत्रणा रस्त्यावर होती. प्रत्येकजण कोरोनाला घाबरल्यामुळे नागरिकही आपल्या घरात होते. त्यामुळे काल (रविवारी) एकही गुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत (कोरोनाच्या नियमाचा भंग वगळता) घडल्याची नोंद नाही. हा देखील एक नवीन विक्रमच म्हणायला हवा.
तसेच कर्फ्यूमुळे शहरात प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट झाल्याची नोंद झाली. हवामान खात्याच्या नोंदणीनुसार हवामानाची गुणवत्ता चांगली व समाधानकारक होती. हवा प्रदूषणाबरोबरच आवाजाच्या प्रदूषणातही मोठी घट आढळली.