जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र; खंडाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ
लोणंद (प्रतिनिधी)- लोणंदचे विद्यमान नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्यावर शुक्रवारी 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला. या तेरा नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे लोणंदसह खंडाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष सचिन शेळके नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. लोणंदच्या प्रथम नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील यांच्यानंतर अनपेक्षितपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या मदतीने नगराध्यक्षपदाची माळ अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांच्या गळ्यात पडली होती. मात्र, कालांतराने राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपशी जवळीक साधत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केल्याने लोणंद नगरपंचायतीवर अवघे दोन नगरसेवक निवडून येऊनही भाजपचा झेंडा फडकला होता.
नगराध्यक्ष इतर कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता काम करतात. तसेच सर्वसाधारण सभा नियमित बोलावली जात नसल्याने व नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज वेळच्या वेळी होत नाही, नगराध्यक्ष मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे पाच,कॉंग्रेसचे सहा तर भाजपचे दोन अशा एकूण 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 13 नगरसेवकांच्या सह्यांनिशी दाखल केला. यावेळी आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.
या ठरावावर नगरसेवक हणमंत विनायकराव शेळके, विकास लुमा केदारी, श्रीमती शैलजा बाबासाहेब खरात, सौ. हेमलता रमेश कर्णवर, राजेंद्र सीताराम डोईफोडे, कृष्णाबाई भिकू रासकर, सौ. स्वाती शरद भंडलकर, पुरूषोत्तम बाबुराव हिंगमिरे, लक्ष्मणराव सोपानराव शेळके, उपनगराध्यक्ष किरण पवार, सौ. लीलाबाई विलास जाधव, योगेश उत्तमराव क्षीरसागर, सौ. दीपाली रवींद्र क्षीरसागर अशा 13 नगरसेवकांनी आपल्या सह्यांचे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिले.