पदवी परीक्षांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार नसल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बारावीच्या गुणांवरच पदवीची प्रवेश प्रक्रिया होणार असून उद्यापासून पदवी परीक्षेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत बारावीच्या निकालावरच पुढील पदवी परीक्षांसाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पदवी परीक्षांचे प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागाचे पारंपारिक पद्धतीने अभ्यासक्रम सुरू होतील. आवश्यकतेनुसार, तुकड्यांची वाढ किंवा विद्यार्थी संख्येत वाढ हवी असल्यास ३१ ऑगस्टच्या आधी त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी विद्यापिठाने घ्यावी अशा स्पष्ट सूचना माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांपैकी मूल्यांकन प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १९ हजार ७५४ इतकी आहे. मूल्यांकनानंतर बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १३ लाख १४ हजार ९६५ इतकी आहे.
राज्याचा शाखानिहाय निकाल
राज्यात विज्ञान,कला,वाणिज्य, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेतून विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा विज्ञान शाखेसाठी ५ लाख ४४ हजार ७८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के लागला असून ५ लाख ४१ हजार ८०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला विभागात यंदा ३ लाख ७६ हजार ४१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. कला विभागाचा निकाल ९९.८३ टक्के लागला असून ३ लाख ७५ हजार ७९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाणिज्य विभागात यंदा ३ लाख ४९ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्या सर्व विद्यार्थ्यांनी मूल्यांकन प्राप्त झाले. वाणिज्य विभागाचा निकाल ९९.९१ टक्के लागला असून ३ लाख ४९ हजार ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागात सर्वात कमी ४८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील सर्व विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले. या विभागाचा निकाल ९८.८० टक्के लागला असून ४८ हजार ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.