आपल्याकडे मोठ्या भावाला आदरानं “दादा’ म्हणतात. दादा म्हणजे एक वडीलकीचं, आपुलकीचं, जबाबदारी स्वीकारणारं, सगळ्यांची काळजी घेणारं व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत ओळख “दादा’ म्हणूनच आहे. आपल्या धडाकेबाज कामाने त्यांनी ही ओळख सार्थ ठरवली आहे. अशा या “दादा’ माणसाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांची राजकीय वाटचाल सुरू झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस 1999 मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्पावधीत सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी कामातून आपला प्रभाव वाढवला. अजितदादांनी 2014 पर्यंत राज्य मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळली.
प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पक्ष कार्यकर्त्यांना त्यांची कारभाराची कार्यक्षम शैली आकर्षित करते. राज्यातून 2014 मध्ये पक्षाची सत्ता गेल्यानंतरही अजितदादा स्वस्थ बसले नव्हते. राजकीय जीवनात चढउतार होत असतात. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचे नाही,’ असा त्यांचा कार्यकर्त्यांना सांगावा होता. त्यामुळे या काळातही दादांच्या दालनाबाहेरची ना गर्दी कमी झाली, ना त्यांच्यावरचं सामान्य माणसांच प्रेम कमी झालं. सहा वेळा बारामतीचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या अजितदादांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला.
त्यामुळं विकासाच्या या “बारामती मॉडेल’च कौतुक राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांनीही केलं आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त करुन अजितदादा दीड लाखांहून अधिकच्या मतांनी विजयी झाले. सामान्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या दादांवरच प्रेमच या निमित्तानं सामान्य जनतेने दाखवून दिले.
अजितदादांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी पक्षामध्ये त्यांच्या किंवा त्यांच्यापेक्षा जास्त वयाचे अनेक नेते होते. परंतु दादांनी त्यांच्याकडे स्पर्धक म्हणून पाहिले नाही. त्यांनी आपली कामाची पद्धत ठरवली आणि त्यातून स्वतःचा ठसा उमटवला. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करताना दादांनी कामाचा पुन्हा एकदा झपाटा लावला आहे. दादांचा रोजचा दिवस सकाळी सहा वाजता सुरु होतो. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे योग्य आणि काटेकोर व्यवस्थापन करणे ही तर त्यांची खासियत आहे. त्यामुळंच दादांची कोणतीही बैठक अथवा कार्यक्रम अगदी वेळेतच सुरु होतो.
त्यांच्या या वक्तशीरपणाचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राला आहे. वेळेबाबत दादा जसे काटेकोर आहेत तसेच कोणत्याही कामाच्या दर्जात ते कधीही तडजोड करत नाहीत. पुढच्या पन्नास वर्षाचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. टापटीप आणि नीटनेटकेपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि व्यक्तीमत्वातून वारंवार दिसत असतो. विकासकामे करताना ती दर्जेदार असली पाहिजेत, कलात्मक असली पाहिजेत यावर त्यांचा कायम भर असतो. पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते हाती घेतलेले काम कधी मध्ये सोडत नाहीत.
सरकारचा पैसा हा सामान्य माणसाच्या घामाचा पैसा आहे, त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे यावर त्यांचा कायमच कटाक्ष असतो. त्यामुळे सरकारी कामे दर्जेदार करून घेण्यावर त्यांचा भर असतो. अजितदादा हे “व्हिजन’ असणारं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचे एक “व्हिजन’ डोळ्यासमोर ठेऊन ते काम करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून घडलेली प्रत्येक गोष्ट सर्वांगसुंदरच असते.
“काम’ आणि “सामान्य जनता’ हेच त्यांचं व्यसन आहे. ते कोणतीही गोष्ट वरकरणी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट “दिलसे’ करणे, ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. कोणत्याही कामासाठी झोकून देण्याची त्यांची शैली आहे. त्यामुळेच पहाटे साडेपाच वाजताही ते कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेत त्यांना सूचना करताना आपल्याला दिसतात. ही त्यांच्या कामाची तळमळ आहे.
असा झोकून देणारा आणि तळमळीने काम करणारा नेता मिळाला हे महाराष्ट्राचे आणि आपले भाग्य आहे. ते ज्या धडाकेबाज पद्धतीने काम करतात, त्याच सहजतेने आणि जिव्हाळ्याने सामान्य कार्यकर्त्यांची, जनतेची काळजीही घेतात. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आताच्या “करोना’ महामारीच्या आणि लॉकडाऊनच्या काळात दादांच्या कार्यालयातील फोन कायम धडाडत आहेत.
दादांनी करोना उपाययोजनासाठी प्रशासनाला विश्वासात घेवून केलेले प्रयत्न जनता कधीच विसरु शकणार नाही. लोकांना, रुग्णांना त्रास झाला नाही पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर परराज्यात आणि परदेशी अडकलेल्या मराठी माणसांनी दादांनाच विश्वासाने साद घातली होती. त्याला दादांच्याकडूनही तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळेच दादांकडे गेलं तर काम होणारच याची खात्री सामान्य लोकांना असते. सामान्य लोकांचा हा विश्वास हीच दादांची खरी ताकद आहे. कामाचा धडाका आणि लोकांचे प्रेमच दादांचे राजकीय, सामाजिक जीवनातील संचित आहे. हेच संचित त्यांच्या आगामी यशस्वी वाटचालीसाठी “इंधन’ आहे. अशा या “दादा’ माणसाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अजितदादांनी शब्द पाळला
अजितदादा पवार यांनी युवा नेतृत्वांना नेहमीच ताकद दिली असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांचे आयडॉल म्हणून दादांची ओळख आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी त्यांची नेहमीच तळमळ राहिली आहे. कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे दादांचे मूळ गाव असल्यामुळे दादांनी सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना मार्गी लावल्या.
गेली कित्येक वर्षे सातारा मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित होता हा प्रश्न दादांनी दोन दिवसांत मिटवला. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक लॅबसाठी 75 लाख रुपयांची तरतूद करुन दादांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिले. उत्तर कोरेगावमधील वसना- वांगना प्रकल्प मार्गी लावण्यात दादांचा सिंहाचा वाटा आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प, योजना दादांच्या माध्यमातून आगामी काळात मार्गी लागणार आहेत.
मंगेश धुमाळ
कृषी सभापती, (जि. प. सातारा)