मुंबई – पत्रकार परिषद घेत बीसीसीआय व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर जाहीरपणे टीका करणाऱ्या विराट कोहलीबाबत पदाधिकारी संतप्त झाले असले तरीही सध्या त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत, सौरव गांगुली यांनी दिले आहेत.
भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व न सोडण्याचा कोणताही सल्ला बीसीसीआयने आपल्याला दिलेला नव्हता. तसेच एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून घेताना संवादही साधला नाही व प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी एक फोन करून याची कल्पना दिली, असा खुलासा कोहलीने गुरुवारी केला होता. तसेच त्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुली यांनीही कधी संपर्क साधला नव्हता, असेही सांगत बीसीसीआयच्या एकूणच कार्यपद्धतीवर उघडपणे ताशेरे ओढले होते. त्यामुळे गांगुली यांच्यासह मंडळातील पदाधिकारी व निवड समितीचे सदस्य संतप्त झाले होते.
गांगुली यांनी मात्र, या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकारही दिला होता व या सर्व गोष्टी समर्थपणे हाताळण्यास बीसीसीआय समर्थ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता कोहलीवर कोणती कारवाई होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यावर गांगुली यांनी सध्या कोणत्याही कारवाईसाठी बीसीसीआयची तयारी नसल्याचे संकेत दिले होते.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला असून ही कसोटी व एकदिवसीय मालिका अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाची आहे. या दरम्यान खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचे मत कोणीही व्यक्त केलेले नाही. बीसीसीआय हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळेल त्यामुळे अन्य कोणी यात पडण्याचे कारण नाही. कोहलीचे काही गैरसमज झाले असतील तर ते चर्चा करून दूर करण्यावरच बीसीसीआयचा भर राहील, असे सांगत गांगुली यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
संघाचा सोमवारपासून सराव
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यावर लगेचच हॉटेलमध्येच विलगीकरणात राहात आहे. तीन दिवसांचे विलगीकरण संपले की संघातील खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली जाणार आहे. या मालिकेत सपोर्ट स्टाफसह संघासाठी अत्यंत कठोर बायोबबल सुरक्षा ठेवण्यात आली असून त्याचा भंग केल्यास त्याही पेक्षा कठोर कारवाई केली जाणार असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.
रोहित व जडेजा एनसीएमध्ये दाखल
हाताला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतलेला हिटमॅन रोहित शर्मा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाले आहेत. दुखापतीतून सावरण्यासाठी रिहॅब प्रक्रियेत त्यांना सहभागी व्हावे लागणार होते.