नवी दिल्ली – दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिघ ई जमातच्या मर्कज केंद्रात जमलेल्या सर्व लोकांना आता तेथून हटवण्यात आले आहे. गेल्या 36 तासांत तेथून एकूण 2361 जणांना तेथून हटवण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितली. या संबंधात त्यांनी जारी केलेल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की या 2361 लोकांपैकी 617 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित लोकांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.
या साऱ्या प्रक्रियेत मेडिकल कर्मचारी, प्रशासन, पोलीस आणि डीटीसी बसेसच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. या लोकांना तेथून संबंधित ठिकाणी हटवण्यासाठी 36 तास सतत काम करावे लागले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो असे मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. दिल्लीत काल मंगळवारी करोनामुळे 23 जण बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने या शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या आता 120 इतकी झाली आहे. त्यातील 24 जण मर्कज कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.