पाटणा – एनपीआर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरच्या नोंदणीसाठी नागरीकांकडून जे फॉम भरून घेतले जाणार आहेत त्यातील वादग्रस्त मुद्दे काढून टाकण्याची सुचना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकारला केली आहे. नितीशकुमार यांनी आज विधानसभेत सांगितले की, एनपीआर राबताना नागरीकांच्या मनात कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची लेखी सुचना आपण केंद्र सरकारला केली आहे. यात नागरीकांच्या मातापित्याच्या जन्मस्थळा सारखी अनावश्यक माहिती नागरीकांना विचारली जाऊ नये असेही आम्ही केंद्र सरकारला कळवले आहे असे त्यांनी सांगितले.
या फॉर्म मध्ये जेंडर कॉलम मध्ये तृतीयपंथीयांचाहीं उल्लेख असला पाहिजे अशीही सुचना सरकारला करण्यात आली आहे. एनपीआर नंतर एनआरसी लागू केली जाईल असा लोकांमध्ये समज पसरला असला तरी एनआरसी लागू केली जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले असल्याने एनपीआरची अंमलबजावणी करण्याबाबत विरोधकांनी विनाकारण हवा निर्माण करू नये असे आवाहनही नितीशकुमार यांनी विरोधकांना केले आहे.
त्यांच्या निवेदनावेळी राजद आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी आरडाओरड करून बाधा आणण्याचा प्रयत्न केला. सीएए कायद्याच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी आणि लालूप्रसाद यादव या नेत्यांनीच शेजारील देशांतून भारतात आलेल्यांना नागरीकत्व देण्याची मागणी केली होती.