पाटणा – संयुक्त जनता दल पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. आरसीपी सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आपल्या पक्षाकडे आता कोणतेही प्रतिनिधीत्व उरलेले नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
“जेडीयू’चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन यांनीही यावेळी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आरसीपी सिंह यांनी बाहेर पडणे हे अपेक्षितच होते. कारण ते जरी पक्षामध्ये असले, तरी त्यांचे मन दुसरीकडेच होते, असे लल्लन म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळात सामील व्हायचे नाही, असे 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच आम्ही निश्चित केले होते. आमच्या त्या निर्णयावर आम्ही अजूनही ठाम आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या पक्षामध्ये आणि भाजपमध्ये सारे काही आलबेल आहे. भाजपबरोबर मतभेद असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. “निती’ आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार यांच्या अनुपस्थितीवरून तसा अंदाज व्यक्त करण्यात येऊ लागला होता.