पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तर प्रदेश सरकारच्या एका निर्णयावर चांगलेच भडकले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी योगी सरकारने आग्रा व झांसी येथून ३०० बसेस रवाना केल्या आहेत. योगी सरकारच्या याच निर्णयावरून नितीश कुमार यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली असून असं करणं म्हणजे लॉक डाऊनसोबत अन्याय असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
राजस्थानातील कोटा येथे उत्तर प्रदेशासह इतर अनेक राज्यांमधून इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यंदा देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात देशव्यापी लॉक डाऊन घोषित केल्यापासून हे विद्यार्थी कोटा येथेच अडकून पडलेत. याखेरीज प्रवेश परीक्षा देखील लांबणीबावर टाकण्यात आली आहे.
अशातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत परखड टीका करताना, ‘विद्यार्थ्यांना कोटा येथून उत्तर प्रदेशात आणण्याच्या योगी सरकारचा निर्णय हा लॉक डाऊनच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा आहे. सध्या देशातील वातावरण पाहता सोशल डिस्टंसिंग अतिशय महत्वाचे आहे मात्र जर या प्रकारे परराज्यात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी बसेस पाठवल्या जात असतील तर ते निश्चितच लॉक डाऊनसोबत अन्याय करणारे आहे.’ असं वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी, जर परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणलं जात असेल तर कामगारांना का नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला.