नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या हालचालींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच जेडीयूचे बडे नेते उपेंद्रसिंह कुशवाह यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचे नितीश कुमार हे देखील दावेदार आहेत असं वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता जेडीयूचे अध्यक्ष राजीव रंजन सिंग यांच्या मणिपूर व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबतीतील वक्तव्यामुळे जेडीयू पुन्हा एकदा एनडीएमधून बाहेर पडणार काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
पुढील वर्षी मणिपूर व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राजीव रंजन सिंग यांनी जेडीयू या विधानसभा निवडणुकांमध्ये लढणार असल्याचं जाहीर केलं. आम्ही याबाबत आमच्या एनडीएमधील मित्रपक्षांशी चर्चा करू, मात्र त्यांनी आम्हाला या राज्यांतील निवडणुकांमध्ये बरोबर घेतलं नाही तर आम्ही स्वबळावर लढू. जेडीयू अध्यक्षांच्या या विधानामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पेगॅसस प्रकरण
तत्पूर्वी, पेगॅसस प्रकरणावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वक्तव्य करताना, ‘प्रशांत किशोर हे आमच्या पक्षात असताना त्यांचा फोन पेगॅससद्वारे हॅक करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. किशोर हे त्यावेळी आमच्या पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांच्या संपर्कात असल्याने आमच्यासाठी हे प्रकरण गंभीर आहे.’ असं म्हंटल होत. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी, व याबाबत संसदेत चर्चा व्हावी असं म्हणत खुद्द नितीश कुमार यांनी आपलं वजन विरोधकांच्या पारड्यात टाकलं होत.
ओबीसी जातनिहाय जनगणना
ओबीसींच्या जातनिहाय जनगणना व्हावी अशी भूमिका जेडीयूने घेतली असून याबाबत बोलताना नितीश कुमार यांनी पंतप्रधानांशी बोलून याबाबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना न केल्यास बिहार सरकारकडे राज्यातील ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा पर्याय उपलब्ध आहेच असं वक्तव्यही त्यांनी केलं होत.
बिहार विधानसभा निवडणुका
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीयू व भाजप एकत्र लढले. मात्र निकालांमध्ये बिहारमध्ये भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या तर जेडीयूच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्या. मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात पडली तरी मंत्रिमंडळात मात्र भाजपचं वजन वाढलं. यामुळे बिहारमध्ये जेडीयू बॅकफूटवर गेल्याच पाहायला मिळालं.
२०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका भाजपसाठी २०२४ लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहेत. राजकीय दृष्टीने देशातील सर्वाधिक महत्वाचे मानले जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असतानाच एनडीएमधील भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेडीयूच्या नेत्यांची उत्तर प्रदेश निवडणुकांत उडी घेणार असल्याची भाषा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
जेडीयू नेत्यांनी घेतलेला पवित्रा बिहार विधानसभेत संख्याबळात वरचढ ठरलेल्या भाजपला बोटाखाली ठेवण्यासाठी आहे की २०२४ लोकसभा निवडणुका समोर ठेवून कोणत्या नव्या पर्यायांची चाचपणी आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
We aim to make JDU a national party. I’ve held discussions with party leaders in Manipur & UP. We’ll hold discussions with NDA partners. If they don’t make us a partner in these states, we will fight & win the elections alone: JDU President Rajiv Ranjan Singh pic.twitter.com/LX8yknXbSB
— ANI (@ANI) August 7, 2021