नवी दिल्ली (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या पुनरावृत्तीची चाहूल लागताच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला घटस्फोट देत राष्ट्रीय जनता दलासोबत संसार मांडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा देशाची राजधानी दिल्लीत रंगली आहे. जेडीयू-राजदच्या नव्या सरकारमध्ये राजदला उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षपद दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 26 वर्षांच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाला दुसयांदा शॉक दिला आहे. भाजपला एका झटक्यात घटस्फोट देत नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजदसोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे.
जेडीयू आणि राजदचे नवीन सरकार कसे असेल याबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील. तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री बनविले जाईल. याशिवाय, बिहार विधानसभेचे अध्यक्षपद राजदला देण्यात आले आहे.
महत्वाचा मुद्या असा की, जेडीयू आणि राजद यांनी निवडणूक आघाडी करून लढविली होती. यानंतर कॉग्रेसच्या सहकार्याने दोन्ही पक्षांचे सरकारही स्थापन झाले. लालूप्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव नितीशकुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. परंतु, कालांतराने हे सरकार कोसळले आणि नितीशकुमार यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनविले.
चर्चेनुसार, जेडीयू आणि भाजप यांच्यातील तणाव शिगेला पोहचला होता. गृह मंत्री अमित शहा जेडीयूमध्ये फूट पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत, अशी शंका नितीशकुमार यांना आली होती. जेडीयूचे नेते आरसीपी सिंग हे गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत असा आरोपही त्यांनी लावला होता. यानंतर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा नितीशकुमार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, यात ते अपयशी ठरले. बिहारच्या विधानसभेत एकूण 243 सदस्य आहेत. बहुमतासाठी 122 मतांची गरज आहे. यात सर्वाधिक 79 आमदार राजदचे आहेत. यानंतर दुसया क्रमांकावर भाजप आहे. भाजपचे 77, जेडीयूचे 45, कॉग्रेसचे 19, सीपीआयएमलच्या अध्यक्षतेखालील डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत.