नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांच्या एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. अजूनही शेतकरी आणि सरकारमध्ये कृषी कायद्यातील मुद्द्यांवरुन मतभेद सुरुच आहेत. यातच या आंदोलनावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी अधिक आक्रमक होत आहेत. याच आंदोलनावरून आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी
‘शेतकऱ्यांसोबत जर संवादच झाला नाही, तर चुकीचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. त्यामुळे, संवाद झाल्यास चर्चेतून मार्ग निघेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि सर्व प्रश्न संपतील. आमचं सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधेल, त्यांना पटवून देईल आणि चर्चेतून नक्कीच मार्ग काढेल.’