मुंबई, दि. 26 – दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या खूप मोठ्या कामाला फक्त तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्ष घालवली, तर हे अभिनंदन करण्यासारख नाही. पण मला हे सांगायची लाज वाटत आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नुतन इमारतीचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी गडकरी यांनी कामास होत असलेल्या विलंबाबाबत तिव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
गडकरी म्हणाले, सर्वसाधारणपणे उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये अशी प्रथा असते की काम पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले जावे. मात्र मला तुमचं अभिनंदन करायचा संकोच वाटत आहे. 2008मध्ये हे काम निश्चित झाले होते. 2011मध्ये त्याचा निविदाही निघाला. मात्र 200 ते 250 कोटींचे हे काम पूर्ण होण्यासाठी 9 वर्षांचा काळ जावा लागला, ही खेदाची बाब आहे. या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी तीन सरकार आणि 8 अध्यक्ष होऊन गेले. ज्या महान लोकांनी 2011 पासून 2020 पर्यंत हे काम केले त्यांचे फोटो या कार्यालयात लावायला हवा. म्हणजे त्यांचा इतिहास लक्षात राहिल, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
दिल्ली-मुंबई महामार्ग हा 80 लाख ते 1 लाख कोटी रुपयांच काम साडे तीन वर्षात पूर्ण झाले. मात्र या अडीचशे कोटींच्या कामासाठी 10 वर्षे लागतील हे अभिनंदन करण्यासारख काम नाही. खरं तर मला हे सांगायची लाच वाटते. ज्या अधिकाऱ्यांनी निर्णय न घेता केवळ समस्या निर्माण केल्या, हे 12 ते 13 वर्षांपासून चिकटून बसले आहेत. हे अत्यंत नकारात्मक व विकृत आहे. अशा लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारले जाते हेच मला कळत नाही, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.