मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मदत हवी असल्याचे बोलले आहे. पावसामुळे रस्त्यांची नेमहीच चाळणी होते. यावर कायमचा उपाय करण्यासाठी गडकरी यांच्याकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मदर मागितली आहे. ते नागपूरच्या उड्डाण पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडतात. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी नितीन गडकरी तुमची मदत हवी आहे, महाराष्ट्राला त्याची गरज आहे. रस्ते असे बनले पाहिजेत की, पुढच्या पिढ्यान् पिढ्या त्यावर खड्डे पडणार नाहीत”
“अनेक ठिकाणी घाट खचलेले आहेत. पूल वाहून गेलेले आहेत. तुमच्याकडचे नवीन तंत्रज्ञान मला रस्ते बांधकामासाठी वापरायचे आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक अडचणींचा सामना सध्या राज्याला करावा लागतोय” असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
राज्य आणि केंद्र शासनाने एकत्र येऊन काम करावे यामध्ये कोणतेही राजकारण आणू नये” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे हे ऑनलाइन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.