मुंबई: नारायण राणेंच्या आत्मचरित्रामुळे जर का राजकीय भूकंप येत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी त्या त्या लोकानी तयार रहावे. आमची खरी बाजू जनतेसमोर येण्यासाठीच हे आत्मचरित्र आहे, नितेश राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
नारायण राणेंना शिवसेनेतून काढावे अन्यथा घर सोडून जाईन, अशा शब्दात उद्धव ठाकरे बाळासाहेबांना ब्लॅकमेलिंग करत असत्, असा दावा राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. त्याचबरोबर अनेक गुपितांवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांचे आत्मचरित्र लिहून तयार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन केले जाणार आहे. आपल्या आत्मचरित्रातून शिवसेना सोडण्यामागचे खरे कारण समोर येईलच असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला बोलावले होते. त्यावेळी राणेंना पक्षात ठेवले तर मी आणि रश्मी घर सोडून जाऊ. ही धमकी उद्धव ठाकरेंनी दिली होती असा दावा नारायण राणेंच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.
शिवसेना, कॉंग्रेस आणि भाजपा असा तिन्ही पक्षांमधला प्रवास आपण लिहिला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, त्यांच्यासोबत फक्त वैचारिक मतभेद आहेत असेही राणे यांनी सांगितले आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने मनोहर जोशींचा माझ्यावर राग होताच. जोशी हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले. वरकरणी मनोहर जोशी पक्षाचे हितचिंतक आहेत असे वाटत असले तरीही त्यांच्यामुळेच शिवसेनेवर आजची स्थिती आहे असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.