इस्लामपूर – मंत्री जयंत पाटलांनी ३१ वर्षाच्या नगरपालिकेच्या कारकिर्दीत जेवढा निधी आणला त्यापेक्षा जास्त निधी नगराध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आणला आहे. याचे ऑडिट मंत्री असणाऱ्या प्रसाद तनपुरे या तुमच्या भाच्याला नगर विकास खात्यामार्फत करायला लावा अन् सोक्षमोक्ष लावण्यासाठी भर यल्लामा चौकात सभेसाठी एका व्यासपीठावर या असे आव्हान मंत्री जयंत पाटलांना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीतून केले.
ते म्हणाल ,” गेल्या वर्षाभरात मंत्रिपदाच्या कारकिर्दीत एक रुपयाचा निधी तुम्ही आणला का ? जबाबदार मंत्र्याने धादांत खोटे बोलणे हे शोभते का ? असा सवालही केला. ते म्हणाले ,” विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा वापरून मंत्रिपदाचा वापर सूडबुद्धीने करत आहात. शहराने तुम्हाला मताधिक्य दिले.
शहर कोरोनाच्या काळात अडचणीत असताना पहिले दहा दिवस तुम्ही कोठे होता ? जनतेसाठी आपल्याला कधी वेळ असतो का ? आपण मागील चार वर्षात कोठे होता ? वर्षभरात शहरासाठी एकही रुपया निधी दिला नाही. आमदार पदाच्या कारकिर्दीत आमदार फंडाचा किती वापर केला ? असे जनतेच्या मनात प्रश्न आहेत. याची जाहीर उत्तरे द्या.
ते म्हणाले ,” कोरोना नंतर नागरिक आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एफआरपी ची पूर्ण रक्कम दिली जाते.मग सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना कोण अडवतो ? शेतकऱ्यांचे नुकसान कोण करतो याला जयंत पाटीलच कारणीभूत आहेत. इस्लामपूर शहरासाठी आलेला निधी स्थगित कोणी केला ? पाच कोटी रुपये दिले असे आपण सांगता पण यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या पत्राद्वारे सभागृहात ठराव झाला होता.
हे पैसे अद्यापही वर्ग झालेले नाहीत राज्याचे जबाबदार मंत्री आहात मग असा मंत्री बेजबाबदारपणे खोटे कसे बोलू शकतो ? सरकार कडून साडेनऊ कोटी रुपये येणे आहेत. ते आणून दाखवा. दोन कोटी रस्ता निधी परत गेली आहे. आपले वजन आहे तर हे पैसे परत आणा. नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील नगर परिषदांची देय अनुदान स्थगित आहेत. ते लवकर देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.
ते म्हणाले ,” आपण लोकनेते राजारामबापू यांचे सुपुत्र आहात त्यांचे फोटो अनेकांच्या देवघरात आहेत. त्यांनी कधीही सूडबुद्धीने,नाटकी घाणेरडे राजकारण केले नाही आपण मात्र त्यात अग्रेसर आहात. तुम्हाला बापूंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेल्या संस्था अलगद मिळाल्या आहेत. यात तुमचे काय योगदान ? संस्था उभी करण्याची जाणीव तुम्हाला आहे का ?
वाळवा तालुक्यातील एन डी पाटील, विलासराव शिंदे, अण्णासाहेब डांगे यांचे कारखाने कोणी होऊ दिले नाहीत. सर्वोदय कारखाना कसा ढापला याबाबत तालुक्यातील जनतेला माहिती आहे.विश्वासघाती सुडाचे राजकारण करणे आता तुम्ही थांबा.
कासेगाव वरून येऊन इस्लामपूर वासियांना काही सुचवू नका. आम्ही इस्लामपूर शहरासाठी सक्षम आहोत. तुम्ही फक्त शनिवार-रविवार साठी इकडे येता. आम्ही शहराच्या साठी २४ तास वेळ देत आहोत. शहरासाठी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष नगरसेवक आहेत. तुमच्यावर पक्षश्रेष्ठींचा विश्वास नाही म्हणूनच तुम्हाला जलसंपदा सारखे साधे खाते तोंडावर मारण्यात आले आहे असा टोलाही निशिकांत पाटील यांनी हाणला.