मुंबई – अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असणारे निसर्ग तीव्र चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ दुपारी दिड वाजण्याच्यासुमारास किनारपट्टीला धडकले, यावेळी ताशी 110 ते 120 किलोमीटर चक्राकार वारे वाहून मुसळधार पाऊस परिसरात पडत आहे.
वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रूप धारण केले आहे. किनारपट्टी लगत वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून पडली. जमीनीवर येताच या वादळाचा वेग कमी होत जाणार आहे. असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे व लँडिंग आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
बेंगळुरूहून आलेल्या फेडएक्सच्या विमानाने लँडिंग केल्यानंतर विमानतळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाण कार्यात कोणताही व्यत्यय आला नसला तरी, वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे उड्डाण व लँडिंगमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने विमानतळावरील ऑपरेशन तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निसर्ग तीव्र चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ मुंबईच्या दिशेने सरकत असल्याने प्रशासनातर्फे बांद्रा-वरळी सी-लिंक, समुद्र किनारे, उद्याने, किनाऱ्या लगतची फुटपाथ इत्यादी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. राज्यातील समुद्र किनाऱ्या लगत वास्तव्यास असणाऱ्या १९००० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.