नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काला आर्थिक संकटात सापडलेला देश सावरण्यासाठी म्हणून ज्या काही घोषणा केल्या आहेत त्याही केवळ दिखाऊ स्वरूपाच्याच आहेत अशी प्रतिक्रीया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली आहे.
या घोषणा म्हणजे केवळ हेडलाईन मॅनेजमेंट आहे प्रत्यक्षात लोकांच्या पदरात यातून काहीच पडणार नाही असे येचुरी यांनी म्हटले आहे. सरकारची मुलभूत धोरणेच चुकीची आहेत. त्यात तज्ज्ञ मार्गदर्शकांचा अभाव आहे. ही दिशाहीन चालबाजी आहे, आकडेवारी लपवून किंवा दिशाभुल करणारी आकडे दाखवून लोकांची फसवणूक केली जात आहे. या दिखाऊ स्वरूपाच्या उपाययोजनांचा काही एक उपयोग नाही असे त्यांनी म्हटले आहे.
अतिश्रीमंत लोकांवरील वाढीव कर मागे घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे पण अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना सुचले नाही. रोजगार निर्मीतीसाठी या घोषणांमध्ये कोणतीही उपाययोजना नाही, गरजु लोकांना या घोषणांमधून काय मिळाले असा सवालही येचुरी यांनी केला आहे. ज्या घोषणा अर्थमंत्र्यांनी अंदाज पत्रकात केल्या होत्या त्याच घोषणा आता त्यांनी केवळ मागे घेतल्या आहेत. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय तरतूदींना आता काही महत्व उरले आहे की नाही असा सवालही त्यांनी केला आहे. केवळ दिखाऊपणा करण्यासाठी सरकारनेच केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदींना सरकारनेच कचऱ्यात फेकण्याचा हा प्रकार अयोग्य आहे अशी टिपण्णीही येचुरी यांनी केली आहे.