नीरा -वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच भाटघर गुंजवणी व नीरा देवघर या धरणांतून आलेल्या पाण्यामुळे वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नीरा (ता. पुरंदर) येथील वॉर्ड नंबर एकमधील गोपाळ वस्तीतील नागरिकांची घरे पाण्याखाली गेली होती. या लोकांना ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या वतीने येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले आहे. मात्र, या प्राथमिक शाळेची इमार मोडकळीस आली असून प्रशासनाने आगीतून काढून फुफाट्यात टाकले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नीरा येथील पूरस्थितीमुळे विस्थापित झालेल्या डोंबारीवस्तीतील लोकांची भेट घेत राज्यमंत्री विजय शिवतारे व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी विचारपूस केली. तर पूरग्रस्त भागातील लोकांना प्राथमिक शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित केल्याबद्दल संजय जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी पुरंदरचे प्रांत, तहसीलदार व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या लोकांची भेट घेऊन पाहणी केली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. शनिवारी (दि. 10) राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या नागरिकांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. तर रविवारी (दि. 11) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्याचबरोबर ज्या भागात या पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. त्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला.
ज्या शाळेत पूरग्रस्तांना निवारा देऊन ठेवण्यात आले आहे. ती शाळा मोडकळीस आल्याने गेल्या वर्षापासून येथील शाळा दुसरीकडे भरत आहे. अशावेळी या नागरिकांना येथे ठेवून प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत आहे का? असा सवाल संजय जगताप यांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच राजेश काकडे, चंद्रकांत धायगुडे, माजी उपसरपंच कल्याण जेधे, नंदू जगताप, जावेद शेख मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.