लंडन – हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचे तातडीने प्रत्यार्पण करावे, अशी आग्रही विनंती भारताने ब्रिटनला केली आहे. कर्जाची परतफेड टाळून बॅंकांना हजारों कोटी रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यानंतर देशाबाहेर पोबारा करणारे नीरव आणि मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये मुक्काम ठोकून आहेत.
भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी युरोपमधील तीन देशांचा दौरा केला. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी ब्रिटनला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल आणि इतर काही मंत्र्यांशी चर्चा केली. त्या चर्चेत श्रृंगला यांनी नीरव आणि मल्ल्या यांना भारताच्या ताब्यात सोपवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा विषय उपस्थित केला.
ब्रिटनमधून प्रत्यार्पण करण्याबाबत मल्ल्याशी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मल्ल्याशी निगडीत गोपनीय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या आदेशावर पटेल स्वाक्षरी करू शकतील.
जामीन मिळाल्याने मल्ल्या सध्या बाहेर आहे. तर, नीरवशी संबंधित प्रत्यार्पणाचा खटला ब्रिटनमधील न्यायालयात सुरू आहे. त्याला सध्या लंडनमधील तुरूंगात ठेवण्यात आले आहे.