हरिद्वार – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु असताना हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात लाखो भाविक एकत्र आले आहेत. आता याचे परिणामही दिसत आहेत. येथील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दोन आखाड्यांनी कुंभसमाप्तीची घोषणा केली आहे.
हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 30 एप्रिलला तिसरे शाहीस्नान आहे. मात्र वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा या दोन आखाड्यांनी 17 एप्रिल रोजीच कुंभ समाप्तीचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय त्यांच्यापुरता मर्यादित आहे. कारण, 13 आखाड्यांची एकत्रित संस्था असलेली आखाडा परिषदेकडून याबाबत अंतिम निर्णय काय घेतला जातो हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र या दोन आखाड्यांच्या निर्णयानंतर इतर पाच, सहा आखाडेही असाच निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, 12 आणि 14 एप्रिलला कुंभमेळ्यातील दुसरे शाहीस्नान पार पडले. यावेळी 50 लाखाहून अधिक भाविक सहभागी झाले होते. त्यामुळे येथे करोनाचा प्रसार वेगाने वाढला. चार दिवसांतच येथील करोना बाधितांची संख्या दोन हजार पार गेली. 19 प्रमुख साधूंनाही करोनाची बाधा झाली. त्यातच काल निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोनामुळे निधन झाले. त्याच पार्श्वभूमीवर दोन आखाड्यांनी कुंभसमाप्तीचा निर्णय घेतला आहे.