वालचंदनगर-येथील निरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक 46 मधून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. परंतू या ठिकाणी कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे या भागात कालव्याचे पाणी वाया जात आहे. जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे वालचंदनगर येथील बाजारपेठेत पाणी साचले असून आजुबाजूच्या शेतातील काही पिकांमध्ये तळी साचली आहेत. या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
वालचंदनगर येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात उसतोडणी सुरू आहे. परंतु त्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे उसतोडणी अर्ध्यावरच सोडून उसतोडणी कामगार उसाचा फड सोडून गेले आहेत. एकीकडे पाण्याचा योग्य वापर करावा यासाठी शासन पाठपुरावा करत आहे. दुसरीकडे केवळ जलसंपदा विभागाच्या कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. वितरिका क्रमांक 46 मधून पाणी आवर्तन सुरू आहे. मात्र जळून चाललेल्या शेतीमधील उभ्या पिकांना पाणी मिळण्याऐवजी पडीक शेतीत,चारी, ओढ्यामध्ये, वालचंदनगर बाजारपेठेत आणि ऊसतोडणी सुरू असलेल्या ऊसाच्या फडात गुडघ्यापर्यंत साचल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
इंदापूर तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. फक्त निरा, भीमा नदीच्या पाण्याच्या विसर्गावर बंधाऱ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे निरा व भीमा नदीकाठच्या शेतीला जीवदान मिळाले आहे. त्यात जलसंपदा विभागाचे अधिकारी सरळ सरळ पाणी वापर संस्थांवर जबाबदारी ढकलून कसे रिकामे होतात असा प्रश्न सध्या संबंधित शेतकऱ्याला पडला आहे. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
- वालचंदनगर येथील कालव्याच्या कडेला असलेला आमचा 5 एकर ऊस तुटून गूळ कारखान्यांना जाणार होता. त्यातील दीड एकर ऊस तुटून गेला मात्र अचानक शेतात पाणी शिरल्यामुळे उसतोडणीत अडथळे निर्माण झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रचंड अपव्यय झाला आहे.
-अंबादास शेळके, शेतकरी. - आम्ही पाणी वापर संस्थांना पाणी दिले आहे. पाणी कोठे आणि कसे वापरायचे हे पाणीवापर संस्थेने ठरवायचे आहे.
-टांगसाळे शाखाधिकारी, जलसंपदा विभाग, अंथुर्णे.