मुंबई: केरळमध्ये निपाळ विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, राज्यात मेंदूज्वराचा रूग्ण आढळल्यास त्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
केरळमधील कोझीकोडेमध्ये 23 वर्षाच्या एका विद्यार्थ्याला निपाह विषाणूचा संसर्ग झाला आहे. पुण्याच्या विषाणू संशोधन केंद्रामध्ये या विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या विद्यार्थ्याला निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्वभूमीवर केंद्रातील आरोग्य खात्याच्या अधिका-यांसोबत सर्व राज्यांच्या आरोग्य खात्याच्या प्रमुखांची एक व्हिडीओ कॉंन्फरन्स झाली.
महाराष्ट्राला निपाह विषाणूचा कोणताही धोका नाही असे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने या बैठकीत स्पष्ट केले आहे अशी माहिती राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. राज्यात फक्त मेंदूज्वर सदृश्य एखादा रुग्ण आढळला तर त्यावर मॉनिटरींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राला निपाहचा कोणताही धोका नसल्याने घारबरण्याची गरज नाही असे डॉ. आवटे म्हणाले.