वाहतूक व्यवस्था आठ दिवसांपासून ठप्प; दोनशे विद्यार्थी शाळेपासून वंचित
सणबूर – गत दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पाटण तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. ढेबेवाडी विभागातील वांग नदीवर असणारे ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. या भागातील कसणीकडे जाणारा पवारवाडी-जाधववाडी येथील पूल आठ दिवसांपासून पाण्याखाली गेला असून या परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटला आहे.
वर्षानुवर्षे अशीच परिस्थिती असून येथील राज्यकर्ते डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. याच भागातील पवारवाडी येथील पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील पागेवाडी, मेंढ, जाधववाडी, मत्रेवाडी, सलतेवाडी, सतिचीवाडी, निनाईवाडी, निवी, कसणी, घोटील, निगडे, माईगडेवाडी आदी अकरा गावे संपर्कहिन झाली आहेत. या परिसरातून ढेबेवाडी येथे मंगळवारच्या बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांना डाकेवाडी-काळगाव-येळेवाडी या मार्गे ढेबेवाडी येथे यावे लागल्याने वेळ आणि आर्थिक फटका सहन करावा लागला.
पूल पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक व्यवस्थाही ठप्प आहे. पावसामुळे साथीचे रोग डोकर वर काढत असून रूग्णांनाही याचमार्गे प्रवास करावा लागत आहे. यामध्ये त्यांचे मोठे हाल होते आहेत. रविवारी अनेक खासगी वाहने त्याचबरोबर निगडे येथून सुटणारी एस. टी. सकाळपासून जाधववाडी पुलाजवळ थांबली होती. त्यानंतर एस. टी. सेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान
ढेबेवाडी विभागातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना ढेबेवाडी, तळमावले येथे शिक्षणासाठी जावे लागते. मात्र पवारवाडी येथील पूल आठ दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचे ुकसान होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती असल्याने येथील विद्यार्थी मागे पडत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.