अकोले -अकोले तालुक्यात सध्या पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसाची हजेरी सुरूच आहे. या पावसाने या भागातील दुसरे महत्त्वाचे निळवंडे धरण आज सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले.
धरण भरताच दक्षता म्हणून धरणातून सातशे क्यूसेक्सने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच भंडारदरा धरणातून विद्युत ग्राहक क्रमांक एकमधून 812 क्यूसेक्स विसर्ग काल सायंकाळी सहा वाजता सोडण्यास प्रारंभ झाला आहे.
मागील पाच वर्षे निळवंडे धरण सातत्याने भरत आलेले आहे. याही वर्षी या धरणाने शेतकऱ्यांना सुख-समृद्धीचे स्वप्न दाखवणारे धोरण कायम ठेवले आहे. धरणाची साठवण क्षमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट इतकी असून, 7 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता झाल्यावर हे धरण तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे घोषित केले जाते. त्यामुळे हे धरण गेल्या महिन्यातच तांत्रिकदृष्ट्या
भरले होते. परंतु पाणी पातळी सततच्या पावसामुळे नियंत्रित ठेवून हळूहळू या धरणाचा पाणीसाठा जलसंपदा विभागाने वाढवत नेला आणि आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. नगर जिल्ह्याचे 66 हजार 266 व नाशिक जिल्ह्याचे 2 हजार 612 हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलीताखाली येते. त्यात नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, राहुरी, तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याला या धरणाचा लाभ होतो. डाव्या कालव्याची लांबी ही 85 किलोमीटर असून, उजवा कालवा 97 किलोमीटर इतका आहे.
धरणाचे पाणलोटक्षेत्र 202.21 चौरस किलोमीटर आहे. धरणाची लांबी 540 मीटर असून, सांडव्याची लांबी 72 मीटर आहे. धरण भरले असले, तरीही धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. ही कामे अपूर्ण असल्याने सिंचनाचे अपेक्षित उद्दिष्ट सध्या तरी साध्य होत नाही.
निळवंडेस सध्या साठवण धरण म्हणून संबोधले गेले, तर त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. निधीची कमतरता असून, दोन्ही कालव्यांची कामे वेगाने सुरू नाही. अकोले व इतर ठिकाणी वितरिका बंदीस्त की खुल्या याचे धोरण निश्चित नसल्याने या कामावर निश्चितपणे परिणाम होतो आहे.