संगमनेरमध्ये महाविकास आघाडीतर्फे थोरातांचा नागरी सत्कार
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले असून पक्षनेतृत्वाने सातत्याने मोठा विश्वास टाकला आहे. आपणही प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले. राज्य व जिल्ह्यामध्ये काम करतांना निळवंडे धरण ही आपली प्राथमिकता असून या धरणाच्या कालव्यांद्वारे लवकरात लवकर दुष्काळी भागाला पाणी देणार असल्याची ग्वाही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यशोधन प्रांगणात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, शेतकरी विकास मंडळ व तालुक्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आ.लहु कानडे, आ. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कांचनताई थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ऍड. माधवराव कानवडे, अशोकराव भांगरे, रणजितसिंह देशमुख, रामदास वाघ, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, अर्चनाताई बालोडे, लताताई डांगे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सरकारकडून जनतेच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. लोकसभेमध्ये अपयश आल्यानंतर कॉंग्रेसमधून अनेकांनी पक्षांतर केले मात्र अडचणीच्या काळात पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी दिली. आपणही प्रामाणिकपणे काम करून मेहनत केली. हा जीवनातील अतिशय वेगळा कालखंड होता. अविश्रांतपणे काम केल्याने कॉंग्रेसला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस प्राप्त झाले. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
हे सरकार सर्व सामान्य माणसाचे हित जोपासणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येवून लोकशाहीच्या नव्या युगाचा अध्याय सुरू झाला आहे. निळवंडे धरणाचे कालवे लवकरात लवकर पुर्ण करुन या धरणाचे पाणी दुष्काळी भागाला देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. याकामी आता अकोल्याचे आमदार व श्रीरामपूरचे आमदार मदत करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आ.डॉ. तांबे, आ. कानडे, आ. डॉ. लहामटे, राजेंद्र फाळके, सचिन गुजर, सुधाकरराव रोहम, हिरालाल पगडाल, डॉ.एकनाथ गोंदकर, अशोकराव भांगरे अशोकराव खांबेकर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले.