बाळसाहेबांनाच केले लक्ष्य
मुंबई – आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुखांवरच टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपला वीर सावरकरांचा खोटा पुळका आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा संघ परिवार कोठे होता?, असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्राच्या संपादकीयमधून केला होता. त्यावर राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
‘बाळासाहेब होते का स्वतंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोणी ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवली केली. तो इतिहास लोकं विसरलेली नाही,’ अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे, असं म्हणत शिवसेनेने तत्कालिन संघ परिवार आणि भाजपावर निशाणा साधला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला बंदी उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल. ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे रेकॉर्ड सांगतेय असे शिवसेनेने म्हटले होते. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.