मुंबई – लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. वीजबिलात माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
निलेश राणे म्हणाले, ठाकरे सरकारला झटका देण्याची वेळ आली आहे. देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी लोकांसाठी सरकारी तिजोरीतील एक दमडीचा फायदा थेट लोकांपर्यंत पोचवला नाही. सगळं जर-तर, किंतु-परंतु आणि सर्वात शेवटी कोमट पाणी प्या आणि स्वतःची स्वतःचं काळजी घ्या, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांना वीजबिलांतून ठाकरे सरकारकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ठाकरे सरकारकडून वीजबिलाच्या प्रश्नावरून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. वाढीव वीजबिलाबाबत कोणताही निर्णय गुरुवारच्या बैठकीत झालेला नाही.