मुंबई – महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. परंतु, मी असे काही बोललो नाही, हे वृत्त निराधार असल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला. मात्र, गृहमंत्र्यांच्या या विधानावरून शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे म्हणाले कि, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला, असे उत्तर त्यांनी शिवसेनेला दिले आहे.
शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 21, 2020
दरम्यान, शिवसेनेने सामना संपादकीयमधून फडणवीसांचा शपथविधी आणि काही अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले.