अहमदाबाद – गुजरातला लॉकडाऊनची गरज असल्याचे तेथील उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर अखेर राज्य सरकारने धोकादायक बनलेल्या राज्यातील महत्त्वाच्या 20 शहरांत नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. सोबतच, लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची संख्याही सीमित केली असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली.
गुजरातमध्ये बुधवारपासून शहरांत रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला. लग्न समारंभात 100 जण सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असून सरकारी कार्यालयही 30 एप्रिलपर्यंत शनिवारच्या दिवशी बंद राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत.
संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तीन – चार दिवसांसाठी कर्फ्यू, नाईट कर्फ्यू अन्यथा लॉकडाऊन करण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून शहरांत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली.