मुंबई – जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आले असले तरी भारतामध्ये औद्योगिक आघाडीवर काही सकारात्मक घटना घडल्या. त्यामुळे खरेदी चालूच असून निर्देशांक पुन्हा विक्रमी पातळीकडे आगेकूच करीत असल्याचे वातावरण आहे.
सध्याच्या अस्थिर परिस्थितीतही रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस या बड्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. इंडसइंड बॅंक, एअरटेल, टायटन, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 445 अंकांनी वाढून 59, 744 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 131 अंकांनी म्हणजे 0.74 टक्क्यांनी वाढून 17,822 अंकांवर बंद झाला.
या खरेदीच्या वातावरणातही पावर ग्रिड, आयटीसी, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. नेस्ले कंपनीचा शेअरही घसरला. रिलायन्स सिक्युरिटीज या कंपनीचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, भारतामध्ये सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढीव पातळीवर असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली.
दुसऱ्या तिमाहीचे ताळेबंद पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. या कालावधीत भारतामध्ये निर्बंध नव्हते. त्यामुळे विविध कंपन्यांची उत्पादकता या काळात वाढली असण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण या आठवड्यात जाहीर होणार आहे. रिझर्व बॅंकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिझव्ह बॅंक विकास दर वाढीला चालना देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंक फारसे कडक पतधोरण जाहीर करणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र भारतीय निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून महागाई हा चिंतेचा विषय राहणार आहे. जागतिक बाजारांमध्ये उत्पादन मर्यादित आणि मागणी वाढल्यामुळे क्रुडचे दर वाढत आहेत. आज क्रुडचा दर 81 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेला.
क्रुडची दर वाढल्यानंतर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कारण भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के इतके क्रुड आयात करतो. यासाठी भारताला परकीय चलन वापरावे लागते. त्याचा भारतीय रुपयावर दबाव येतो. त्यामुळे जर महागाई वाढली तर आगामी काळात निर्देशांकावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.