हैदराबाद – एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले तेलगू कवी आणि लेखक वरवरा राव यांच्या दोन जावयांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
यापैकी के. सत्यनारायण हे हैदराबादेतील इंग्लिश ऍन्ड फॉरेन लॅंग्वेजेस युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. तर दुसरे जावई हे इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. या दोघांनाही 9 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ‘एनआयए’कडून बजावण्यात आले आहे.
आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सत्यनारायण यांनी म्हटले आहे. एप्रिल 2018 मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा घातला होता. एल्गार परिषद आणि माओवाद्यांमधील कथित संबंधांच्या प्रकरणी वरवरा राव आणि अन्य 9 कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पुणे पोलिसांनी केला होता.
या वर्षी जानेवारीमध्ये हे प्रकरण ‘एनआयए’कडे हस्तांतरित केले गेले. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळेच दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा युद्धस्मारकाजवळ हिंसाचार उसळला होता, असा पोलिसांचा आरोप आहे.