नवी दिल्ली – नागरिकता संशोधन विधेयक कायद्याविरुद्ध प्रदर्शन केल्याप्रकरणी एक वर्षाहून अधिक काळ कारागृहात असलेले कृषक मुक्ती संग्राम समितीचे (केएमएसएस) नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी मंगळवारी पत्र पाठवून आपला मानसिक आणि शारिरीक छळ सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या अटीवर जामीन मिळवून देण्याचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
गोगोई यांच्या रायजोर दल पक्षाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं की, शेतकरी नेते गोगोई यांना १८ डिसेंबर २०१९ रोजी न्यायालयाच्या परवानगी शिवाय दिल्लीला नेण्यात आलं होतं. त्यावेळी मला एनआयएच्या मुख्यालयातील कारागृह एकमध्ये ठेवण्यात आलं. तिथे मला केवळ गादी आणि एक पांघरून दिलं होतं. ३-४ डिग्री सेल्सीयस वातावरणात मला जमिनीवर झोपवलं होतं.
दरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाल्यास तत्काळ जामीन देण्याचा प्रस्ताव आपल्याला दिला होता. याचा विरोध केल्यानंतर त्यांनी लगेच भाजपमध्ये सामील होण्याचा आणखी एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. कोणत्याही रिक्त जागेवरून तुम्ही निवडणूक लढवू शकता आणि मंत्री होऊ शकता, असंही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचा आरोप गोगोई यांनी पत्रात केला आहे.
दरम्यान आसाममध्ये लोकांचं धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन धर्मीय बनविण्यात येत आहे. याविरुद्ध काम करण्यासाठी एनजीओ स्थापन करा, त्यासाठी 20 कोटी रुपये मिळतील, असंही अमिष दाखविण्यात आलं. मात्र मी सगळे प्रस्ताव नाकरल्यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री किंवा प्रवावी मंत्र्यांशी माझी भेट घालून देण्याचा प्रस्ताव दिला. हेही नाकारल्यानंतर एनआयएने माझ्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले. तसेच १० वर्षे कारागृहात आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचे गोगोई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २० डिसेंबर रोजी माझी तब्येत बिघडली होती.
या संदर्भात भाजपचे प्रवक्ते रुपम गोस्वामी यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. गलिच्छ राजकारण करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं. मतदानाला चार दिवस शिल्लक असताना हे पत्र उघड कऱण्यात आलं आहे. केवळ मत मिळविण्यासाठी ही चाल असल्याचं त्यांनी नमूद केलं.