अलिकडच्या काळात महिला क्रिडा क्षेत्रात अत्यंत सुखद चित्र पाहायला मिळतय. जागतिक स्पर्धेतलं सुवर्णपदक पटकावल्यानंतर पी व्ही सिंधू ऑल इंग्लंड बॅडमिंटन मधील कामगिरी ने गाजत आहे. विनेश फोगट हि बॉक्सर नुकतीच टोकियो ऑलिंपिक साठी क्वलिफाय झाली. अशी कामगिरी करणारी पहिली बॉक्सर होण्याचा मान तिने मिळवला.
मागील वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं ते हिमा दासने. आसामच्या या अठरा वर्षीय खेळाडूने चकित करणारी कामगिरी करताना पोलंड व झेक मध्ये झालेल्या विविध जागतिक स्पर्धामध्ये दोनच आठवडयांत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीतली ५ सुवर्णपदके पटकावली. तिने एक्स्प्रेस म्हणून नावलौकिक मिळवला आहे. द्युती चंदनेही १०० मी शर्यत जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
आत्ताच्या कालावधीतलं सर्वात मोठं यश म्हणजे महिला क्रिकेट संघाची कामगिरी. टी-२० वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची मोठी कामगिरी या संघाने केली.
मिताली राज, स्म्रिती मनधना, हरमनप्रीत अशी मोठी नावं भारतीय संघात आहेतच, पण शेफाली वर्मा या नावाची ओळख क्रिकेट जगताला झाली. शेफालीने विश्वकरंडकात अत्यंत तुफानी कामगिरी केली. अनेक वादांनंतरही आपणच बॉस असल्याचं मेरीकोमने दाखवून दिलं. जागतिक स्पर्धांमधलं ८वं पदक जिंकताना तिने विश्वविक्रमाला गवसणी घातली. या वर्षातही वयाच्या या टप्प्यावर तिचा फॉर्म व कामगिरी जबरदस्त अशीच होती . नुकतीच तिने ऑलिंपिक पात्रता सुद्धा मिळवली आहे.
मिताली राज, साईना, सानिया, पीटी उषा यांच्यानंतरच्या पुढच्या पिढीच्या सुपरस्टार आपल्याला मिळाल्या आहेत असं विशेषत्वाने दिसतंय. एकंदरीत महिला क्रिडा क्षेत्राचा वारू सुसाट सुटलाय अस म्हणायला हरकत नाही.
-ऋषिकेश कदम